फलटण – फलटण तालुक्यातील हणमंतवाडी येथील ७५ वर्षीय शेतकरी मारुती चिमाजी पवार यांनी आपल्या शेतातील ऊस चोरीला गेल्याची तक्रार करत शरद चंद्रकांत पवार यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
मारुती पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गट क्रमांक ३०१ मधील ऊस हा मयत कै. नागनाथ जिजाबा पवार यांच्या मालकीचा असून, सदर जमिनीच्या वारसाबाबतचा नोंदीची प्रक्रिया फलटण दिवाणी न्यायालयात Civil M.A. No. 78/2024 या प्रकरणात प्रलंबित आहे. वारस कोण हे अद्याप निश्चित झालेले नाही.
या पार्श्वभूमीवर, ऊस तोडणीपूर्वीच मारुती पवार यांनी फलटण तालुक्यातील चारही साखर कारखाने तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्यास लेखी पत्रव्यवहार करून, न्यायालयीन निकाल लागेपर्यंत सदर ऊस कोणाच्याही सांगण्यावरून तोडू नये, अशी पूर्वसूचना दिली होती.
तरीही, संबंधित ऊस ऊसतोड टोळी मुकादम चेतन पवार रा. आडगाव, चिट बॉय गणेश संजय गायकवाड रा. आसू यांच्या माध्यमातून, तसेच MH 42 BN 5019 क्रमांकाच्या गलांडे यांच्या ट्रॅक्टरद्वारे तोडून थेट माळेगाव सहकारी साखर कारखान्यात घातल्याचा आरोप मारुती पवार यांनी केला आहे.
यानंतर मारुती पवार यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बरड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असता, तेथे त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना थेट साखर कारखान्यात जाऊन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानुसार, मारुती पवार यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात लेखी निवेदन देत, न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सदर उसाचे बिल कोणालाही अदा करू नये, तसेच ऊसतोड टोळी, चिट बॉय व संबंधित व्यक्तींची चौकशी करून बिल कोणाच्याही खात्यावर जमा करू नये, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून, आता पोलीस प्रशासन व माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(18 जानेवारी 2026 ते 20 जानेवारी 2026 या कालावधीत ऊस तोडण्यात आला आहे )










