फलटण – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फलटण नगर परिषदेच्या वतीने आयोजित मुख्य ध्वजवंदन समारंभात नगराध्यक्ष श्री. समशेरशिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष म्हणाले की, प्रजासत्ताक दिन हा संविधानाची ताकद, लोकशाहीचे मूल्य आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी यांची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील सर्व शहीद, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांना त्यांनी अभिवादन केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून उभे राहताना हा सन्मान वैयक्तिक नसून फलटणकरांनी लोकशाहीवर दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
फलटण शहराचा सर्वांगीण, समताधिष्ठित व शाश्वत विकास हेच आपल्या कार्यकाळाचे मुख्य ध्येय राहील, असे स्पष्ट करत त्यांनी विकासाची दिशा मांडली.
नगराध्यक्षांनी शहराच्या विकासासाठी स्वच्छता व आरोग्य सेवांवर भर, दर्जेदार रस्ते व पायाभूत सुविधा, तरुण व महिलांसाठी रोजगार व कौशल्य विकास, पारदर्शक प्रशासन आणि कोणताही भेदभाव न करता सर्वसमावेशक विकासावर भर देण्याची ग्वाही दिली.
फलटण हे केवळ शहर नसून प्रत्येक नागरिकाची ओळख व अभिमान असल्याचे सांगत, शहराच्या प्रगतीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेवटी प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांनी संविधानाचे पालन करणे, शहर स्वच्छ ठेवणे, कायद्याचा सन्मान करणे आणि फलटणला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले.












