३० मार्चपासून प्रक्रिया सुरू, ६ मेपर्यंत निकाल जाहीर होणार
फलटण – राज्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणूक प्रक्रियेची सुरुवात ३० मार्च २०२६ रोजी नोटीस प्रसिद्ध होण्यापासून होणार असून २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ७ एप्रिलपासून सुरू होऊन १३ एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्जांची छाननी १५ एप्रिल रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १७ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहणार आहे. मतदानानंतर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार असून, अधिकृत निकाल ६ मे २०२६ पर्यंत प्रसिद्ध केला जाणार आहे.
ही पोटनिवडणूक ग्रामपंचायतीतील रिक्त जागा भरण्यासाठी होत असून संबंधित प्रशासनाने सर्व तयारी सुरू केली आहे. फलटण तालुक्यातीलही ग्रामपंचायत पोटनिवडणूक याप्रमाणे पार पडणार आहे अशी माहिती फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील १३८ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या असून, या प्रक्रियेत सदस्य आणि थेट सरपंच पदांसह एकूण २०६ पदांसाठी निवडणूक होणार आहे.













