जागतिक उच्चरक्तदाब दिनानिमित्त
फलटण : निकोप हॉस्पिटल येथील Physician and Cardiologist डॉ. जे. टी. पोळ यांनी जागतिक उच्चरक्तदाब दिनानिमित्त नागरिकांना उच्चरक्तदाबाबाबत जनजागृतीपर संदेश दिला.
“आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ‘हाय बीपी’ ही समस्या केवळ वृद्धांपुरती मर्यादित राहिलेली नाही. तरुणांमध्येही उच्चरक्तदाबाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ही चिंतेची बाब आहे,” असे डॉ. पोळ यांनी सांगितले.
उच्चरक्तदाब किंवा हायपरटेन्शनला ‘सायलंट किलर’ म्हटले जाते. कारण सुरुवातीला त्याची ठोस लक्षणे दिसत नाहीत. मात्र, तो हृदय, मेंदू आणि किडनीवर गंभीर परिणाम करू शकतो.
डॉ. पोळ यांनी नागरिकांना नियमित रक्तदाब तपासणी करण्याचे आवाहन केले. वय ३० वर्षांपेक्षा जास्त असल्यास वर्षातून किमान दोनदा रक्तदाब तपासणी करावी. बीपीचे सामान्य प्रमाण १२०/८० इतके असावे, असे त्यांनी सांगितले.
तसेच आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवणे, दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम किंवा चालणे, ताणतणाव कमी करण्यासाठी योग व ध्यान करणे, पुरेशी झोप घेणे आणि धूम्रपान-मद्यपान टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“अनेक रुग्ण बीपीची औषधे स्वतःहून बंद करतात, हे अत्यंत धोकादायक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नयेत,” असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
“तुमचे आरोग्य तुमच्या हातात आहे. आजच रक्तदाब तपासा आणि निरोगी आयुष्य जगा,” असे आवाहन डॉ. जे. टी. पोळ यांनी केले.






