बीड – साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे जाण्याचा मार्ग असून बाबासाहेब म्हणजे शिक्षण, संरक्षण, आरक्षण, संघटन, सत्ता आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहेत, असा विचार आयुष्यभर समाजात रुजविण्याचे कार्य स्मृतिशेष आत्मारामजी चांदणे यांनी केले. त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मांगवाड्यापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी केले.
बीड येथे आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी चळवळीतील नेते, कर्मचारी, पत्रकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अजिंक्य चांदणे म्हणाले की, आज अनेक मातंग तरुण ‘जय भीम’चा विचार घेऊन समाजकार्यात सक्रिय आहेत, त्यामागे आत्मारामजी चांदणे यांचे मोठे योगदान आहे. सध्या काही ठिकाणी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात असून दोन्ही महापुरुषांची तुलना करून त्यांचा अपमान केला जात आहे. ही बाब अत्यंत घृणास्पद आहे.
ते पुढे म्हणाले की, आत्मारामजी चांदणे, एकनाथराव आव्हाड आणि विठ्ठलजी उमाप यांसारख्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर हा विचार समाजात रुजविण्यासाठी कार्य केले. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे त्यांच्या त्यागाचे महत्त्व कमी होते. त्यामुळे समाजात द्वेष नव्हे तर बंधुभाव वाढावा यासाठी अशी वक्तव्ये थांबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांकडे जाण्याचा मार्ग; तुलना करून महापुरुषांचा अपमान नको – अजिंक्य चांदणे
By Team LBNN
On: June 5, 2026 4:25 PM







