मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्यांच्या १ ऑगस्ट या जन्मदिवसाला राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे शासन परिपत्रक २९ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे.
परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड, सर्जनशीलता आणि साहित्याविषयीची अभिरुची वाढविण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कविता, कथा, निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा, ग्रंथप्रदर्शने, स्थानिक साहित्यिकांची व्याख्याने, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचन तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि साहित्यावर चर्चासत्रे, परिसंवाद व कार्यशाळांचा समावेश आहे.
यासंदर्भात उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि कला संचालनालयांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शैक्षणिक संस्थांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन संस्कृतीला चालना मिळण्याबरोबरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासनाचा निर्णय
By Team LBNN
On: July 30, 2026 9:10 PM






