नांदेड – अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून मांग (मातंग) समाजाला सरसकट लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे मत डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, आरक्षणाचे वर्गीकरण हा देशव्यापी फॉर्म्युला असून तो धोरणकर्त्यांनी तयार केला आहे. हा निर्णय विविध राज्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेतून लागू झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेसाठी एखाद्या विशिष्ट समाजाला जबाबदार धरणे योग्य नाही.
तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू झाले असले तरी त्या राज्यांतील मातंग समाजाने अशी मागणी केली नव्हती. हा सरकारचा निर्णय असून, समाजामध्ये परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करणे टाळले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, समाजातील महापुरुषांच्या विचारांची शाब्दिक विटंबना होऊ नये, यासाठी सर्वांनी संयम बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले. सरकारसोबत असलेल्या विविध समाजघटकांच्या नेत्यांना या धोरणांबाबत प्रश्न विचारले पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.
हा कार्यक्रम नांदेड येथील पीपल्स कॉलेज येथे शहीद पोचीराम कांबळे बचत गटाच्या वतीने आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यानमालेत पार पडला.







