वडूज (प्रतिनिधी) – अभयसिंह खासेराव जगताप यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच उमेदवारी स्वीकारत कातरखटाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीच्या लढतीत थोड्या मतांच्या फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
मात्र निकालाच्या दिवशी त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा विजय जाहीर होताच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हसतमुखाने शुभेच्छा दिल्या. राजकारणात क्वचितच दिसणारा हा सुसंस्कृतपणा केवळ खटाव तालुक्यालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला भावल्याची भावना व्यक्त होत आहे.
पराभवानंतरही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आभार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा कातरखटाव येथील कात्रेश्वर मंगल कार्यालयात बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
“माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कातरखटाव जिल्हा परिषद गटातील सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांप्रती प्रेम व जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी हा आभार मेळावा आहे,” असे त्यांनी सांगितले.
सामान्यतः आभार मेळावा विजयानंतर घेतला जातो; मात्र पराभवानंतरही जाहीर आभार मेळावा घेण्याची ही खटाव तालुक्यातील पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अभयसिंह जगताप यांच्या या भूमिकेची भविष्यकाळात निश्चितच दखल घेतली जाईल, अशा भावना नागरिक व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत.
अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा
By Team LBNN
On: February 17, 2026 10:26 AM
---Advertisement---











