लोकशाही भारत न्यूज | विशेष लेख
जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल त्रयोदशीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी महावीर जयंती साजरी होत आहे. हा दिवस जैन समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या निमित्ताने जैन मंदिरांची आकर्षक सजावट केली जाते, भगवान महावीरांच्या मूर्तींचे अभिषेक व पूजन केले जाते आणि अनेक ठिकाणी भव्य रथयात्रा काढल्या जातात. तसेच दानधर्म, अन्नदान आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजात सद्भावना वाढवली जाते.
भगवान महावीरांनी दिलेले पंचमहाव्रत हे जैन धर्माचे मूलभूत तत्त्व आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच मूल्यांवर त्यांनी विशेष भर दिला. कोणत्याही जीवाला इजा न करणे, सत्य बोलणे, चोरी न करणे, इंद्रियसंयम राखणे आणि लोभ टाळणे या शिकवणी आजही मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरतात. महावीरांचा संदेश केवळ धार्मिक नाही, तर तो सामाजिक आणि नैतिक जीवनासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे.
भगवान महावीरांचा जन्म इ.स.पूर्व ५९९ मध्ये वैशालीजवळील क्षत्रियकुंड येथे झाला. त्यांचे बालनाव वर्धमान होते. राजघराण्यात जन्म असूनही, वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी सर्व सुखसुविधांचा त्याग करून ज्ञानप्राप्तीसाठी तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला. १२ वर्षांच्या कठोर साधनेनंतर त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले आणि पुढील आयुष्य त्यांनी धर्मप्रसारासाठी अर्पण केले. वयाच्या ७२ व्या वर्षी पावापुरी येथे त्यांनी निर्वाण प्राप्त केले. त्यांचे जीवन त्याग, संयम आणि आत्मज्ञानाचे प्रतीक असून आजही त्यांच्या शिकवणी समाजाला शांतता आणि सुसंस्कृततेचा मार्ग दाखवतात.







