श्रीमंत संजीवराजेंना आमदार करण्याची लोकभावना शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवू – मंत्री उदय सामंत
फलटण : “अतिरिक्त एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांवर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि त्यांना अपेक्षित मोबदला देऊनच एमआयडीसी उभी केली जाईल,” अशी स्पष्ट ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
फलटण येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मॅग्नेशिया कंपनीला विस्तारासाठी येत्या महिनाभरात एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असे सांगितले. तसेच अतिरिक्त एमआयडीसी मंजुरीबाबतही सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
लोकशाही भारत न्यूजने तीन महिन्यांपूर्वी अतिरिक्त एमआयडीसी संदर्भातील आश्वासनाची बातमी प्रसिद्ध केली होती . त्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या विषयावर पुन्हा भाष्य केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, पोटॅशियम परमॅग्नेट निर्मिती करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कारखाना फलटण परिसरात असून पश्चिम महाराष्ट्र फक्त साखर उत्पादनासाठीच नव्हे तर रासायनिक उद्योगांसाठीही ओळख निर्माण करत आहे.
शिवसेना संघटनाबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, “एका लोकसभा मतदारसंघात १६ हजार ५०० पदाधिकारी तयार करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष ठरेल.” शाखाप्रमुख हा शिवसेनेचा कणा असून त्याने पक्षाचे काम तळागाळात पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले. शाखाप्रमुखाला आणि त्याच्या कुटुंबाला संरक्षण देण्याचे काम पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करणार आहेत.
यावेळी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि शरद पवार यांनीही शिवसेनेच्या शाखा रचनेतून प्रेरणा घेत पक्षविस्तार केल्याचा उल्लेख केला.
दरम्यान, भाषणादरम्यान उपस्थितांमधून “श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांना आमदार करा” अशी घोषणा करण्यात आली. त्यावर उदय सामंत म्हणाले, “जे माझ्या हातात नाही त्याची जबाबदारी मी घेणार नाही. मात्र आपली लोकभावना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी आणि मा. खा.राहुल शेवाळे स्वीकारत आहोत.” यानंतर उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, मा. खासदार राहुल शेवाळे, चंद्रहार पाटील आणि उद्योग मंत्री उदय जी सामंत यांच्या हस्ते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि फलटण नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.








