फलटण : फलटण नगरपरिषदेच्या वतीने सोमवार पेठ येथे सुरू करण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, मुख्याधिकारी निखील जाधव, बांधकाम समितीचे सभापती सोमाशेठ जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ नेते मिलिंद नेवसे, भीमदेव बुरुंगले तसेच विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
प्रत्येक प्रभागात आरोग्य सुविधा – रणजितसिंह नाईक निंबाळकर
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण शहरातील प्रत्येक प्रभागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अशा नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांची आवश्यकता आहे.
महिलांसाठी विशेष तपासणी शिबिरे
उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी भोसले यांनी प्रभागनिहाय आरोग्य शिबिरे आयोजित करून विशेषतः महिलांसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करावे, असे सुचवले. महिलांमध्ये आढळणारे आजार, कॅन्सर तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी अशा सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या केंद्राच्या वरच्या मजल्यावर वाचनालय सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून शहरात लवकरच ५० नवीन स्ट्रीट लॅम्प बसविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘५०० रुपयांचा खर्च आता शून्य’ – नगराध्यक्ष
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, यापूर्वी सोमवार पेठ परिसरातील नागरिकांना साध्या तपासणीसाठी शहरात जावे लागत होते. ओपीडी, औषधे आणि प्रवास यासाठी साधारण ५०० रुपये खर्च होत होता. आता या आरोग्यवर्धिनी केंद्रामुळे नागरिकांना मोफत तपासणी व उपचार मिळणार आहेत.
या केंद्रात रक्त तपासणी, लघवी तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच कॅन्सर तपासणीसारख्या विविध चाचण्या उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहराच्या विकासाला नवी गती – भीमदेव बुरुंगले
ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांनी सांगितले की, शहरातील दुर्लक्षित भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळत आहे.
शहरात चार आरोग्यवर्धिनी केंद्रांची योजना
प्रास्ताविक करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. शहरात एकूण चार आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याची योजना असून अनेक वर्षे जागेअभावी ही योजना प्रलंबित होती.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक सोमाशेठ जाधव आणि नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सेवा आता शहरातील नागरिकांना या केंद्रातून उपलब्ध होणार असल्याने उपजिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दत्तनगर येथील जुन्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जागेत तिसरे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साखरवाडी गटाच्या आशा गटप्रवर्तक सारिका घार्गे यांनी केले.












