मोशन सेन्सिंग स्प्रे तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील सुरक्षिततेला नवे बळ
मुंबई – महाराष्ट्रातील फलटण येथील तीन तर कऱ्हाड येथील एका तरुण संशोधकांच्या टीमने मानव–बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी विकसित केलेल्या अभिनव उपकरणाचे पेटंट अधिकृतरीत्या प्रकाशित झाले आहे.मोशन सेन्सिंग स्प्रे तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील सुरक्षिततेला नवे बळ मिळाले असून मानव बिबट्या संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेले हे उपकरण ग्रामीण भाग, शेती परिसर तसेच जंगलालगतच्या वस्तीमध्ये बिबट्यांच्या वावरामुळे निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या उपकरणासाठी फलटण येथील चार तरुणांनी कऱ्हाड येथील मित्राच्या बरोबर पेटंट अर्ज दाखल केला होता. या अर्जाची नोंदणी ७ जानेवारी २०२६ रोजी झाली असून आता त्याचे अधिकृत पेटंट प्रकाशन झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील तरुण संशोधकांचा पुढाकार
या संशोधनात सहभागी असलेले संशोधक हे सातारा जिल्ह्यातील वाठार निंबाळकर, आदर्की, भिलकटी, साखरवाडी ता फलटण आणि कराड या गावांचे रहिवासी आहेत. सध्या ते महाराष्ट्र तसेच देशातील विविध संस्था आणि संघटनांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये डॉ रूपेश यादव , महेश मोरे , श्रीनाथ चव्हाण ,अमित डिसले , आशिष कदम यांनी अथक परिश्रम करून हे उपकरण बनवले आहे
लहानपणापासूनच या सर्वांना निसर्ग आणि वन्यजीवांची विशेष आवड आहे. त्यामुळे वर्षभरात हे सर्व मित्र भारतातील विविध राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांना भेट देत असतात. या भेटीदरम्यान ग्रामीण भागातील मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या त्यांच्या लक्षात आली आणि त्यावर तांत्रिक उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली.
वाढता मानव-बिबट्या संघर्ष
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत असून काही ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. काही प्रसंगी मानवी जीवितहानीही झाली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्याच्या परिस्थितीत बिबट्यांना मानवी वसाहतींपासून दूर ठेवण्यासाठी वन विभाग तसेच विविध खाजगी स्वयंसेवी संस्था विविध उपाययोजना करत आहेत. मात्र या समस्येवर तांत्रिक स्वरूपातील प्रभावी उपायांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
उपकरण कसे काम करते?
हे उपकरण मोशन सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. परिसरात बिबट्या किंवा इतर मोठे वन्य प्राणी आल्यास सेन्सर सक्रिय होतो आणि उपकरणातून विशेष प्रकारचा स्प्रे फवारला जातो. हा स्प्रे प्राण्यांना कोणतीही इजा न करता त्यांना त्या परिसरापासून दूर ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होण्यास मदत होऊ शकते.
मानव सुरक्षितता आणि वन्यजीव संवर्धन या दोन्ही क्षेत्रांना एकत्रितपणे हाताळणारे हे तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे महाराष्ट्रातील संशोधकांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.








