महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे नवे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच आयएएस अधिकारी Tukaram Mundhe यांनी राज्यभरात धडक मोहीम सुरू केली आहे. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सलग दोन दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईत भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाचे तूप-खवा उत्पादन आणि रसायनांचा वापर करून फळे पिकवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
FDA च्या पथकाने विविध डेअरी, मिठाई उत्पादन केंद्रे आणि फळ विक्रेत्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात नमुने जप्त केले. काही ठिकाणी मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारे रसायने वापरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. निकृष्ट दर्जाचे तूप, बनावट खवा आणि कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे बाजारात विक्रीसाठी आणली जात असल्याचेही निदर्शनास आले.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
या कारवाईमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून FDA कडून पुढील काही दिवस राज्यभर विशेष तपास मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे FDA कडून झालेल्या धडक कारवाईनंतर आता सातारा जिल्ह्यातही अशाच प्रकारची मोहीम राबवली जाणार का? याकडे नागरिकांसह ग्राहकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः दूध, तूप, खवा, मिठाई आणि फळ विक्री व्यवसायात भेसळीचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातही FDA प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम हाती घेऊन भेसळखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






