महादेव गायकवाड यांनी कामगार संघर्ष संघटनेच्या माध्यमातून साजरी केली संयुक्त जयंती!
फलटण – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कामगार संघर्ष संघटना, फलटण यांच्या वतीने रविवार पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये वकृत्व, निबंध लेखन, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे उपस्थित होते. तसेच मान्यवर म्हणून पत्रकार सागर चव्हाण, मानवाधिकार संघटना सातारा जिल्हाध्यक्ष रणधीर भोसले, प्रेम मोरे, पत्रकार राजकुमार काकडे, आप्पा तांबे व अॅड. मनीष काकडे उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, वही व पेन देऊन गौरविण्यात आले. तसेच नागरिकांना महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रस्ताविकेत आयोजक महादेव गायकवाड (आप्पा) यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून संयुक्त जयंतीनिमित्त या स्पर्धांचे आयोजन केले जात असून, लहानशा गल्लीतूनही दोन तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत.
यावेळी पत्रकार सागर चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महात्मा फुले यांनी समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले, ज्यामुळे पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखे महान व्यक्तिमत्व घडले. त्यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा केला. आणि जगाला दाखवून दिले की, पाण्यावर प्रत्येक सजीवाचा हक्क आहे .
रणधीर भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ही गल्ली जरी लहान असली तरी ती विचाराने मोठी आहे.”
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; ते घेतल्याशिवाय कोणीही प्रगती करू शकत नाही.”मानवतेचा प्रसार करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.महापुरुषांच्या विचारांवर चालल्यास समाज प्रगत होईल.त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.











