फलटण – स्वच्छ भारत अभियान 2026 अंतर्गत फलटण नगरपरिषदेकडून “स्वच्छ फलटण, सुंदर फलटण” हा नारा देत स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. मात्र प्रत्यक्षात काही भागांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील सोमवार पेठ परिसरातील फिरंगाई देवी मंदिराच्या आसपास घंटागाडी नियमितपणे येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. विशेषतः मंदिराच्या पाठीमागून जाणाऱ्या पूर्वेकडील रस्त्यावर घंटागाडीचा फेरा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
घंटागाडी वेळेवर न आल्याने काही नागरिकांना नाईलाजाने घरगुती कचरा उघड्यावर टाकावा लागत असून त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषद आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेऊन संबंधित भागात नियमित घंटागाडी सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात उघड्यावर कचऱ्याचे ढीग साचल्यास प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.













