अनया पवारने शाळेचे नाव राज्य पातळीवर नेले; तिचे यश अभिमानास्पद : रविंद्र बेडकिहाळ
फलटण येथे अनया पवार हिचा सत्कार करताना रविंद्र बेडकिहाळ, रविंद्र बर्गे, वैशालीताई जाधव, अलका बेडकिहाळ, मनीष निंबाळकर, भिवा जगताप व इतर.
फलटण : भारती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या प्राथमिक परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित ‘श्रीराम विद्याभवन’ प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी अनया किशोर पवार हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेच्या वतीने अनया पवार तसेच इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भारती विद्यापीठाचे आजीव सदस्य रविंद्र बेडकिहाळ आणि भारती विद्यापीठ खारघर (मुंबई) येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई जाधव यांच्या हस्ते सत्कार पार पडला. यावेळी अनयाला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
भारती विद्यापीठाच्या आगामी बैठकीदरम्यान पुणे येथे अनया पवार हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. “अनया पवार हिने संस्थेचे नाव राज्य पातळीवर नेले असून तिचे यश सर्वांसाठी अभिमानास्पद आहे,” असे गौरवोद्गार सेक्रेटरी रविंद्र बेडकिहाळ यांनी काढले.
डॉ. पतंगराव कदम यांनी १९६४ मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने भारती विद्यापीठाची स्थापना केली. ग्रामीण विद्यार्थ्यांनी इंग्रजी व गणित विषयात मागे राहू नये, हा त्यांचा दूरदृष्टीकोन अनयासारख्या विद्यार्थ्यांनी सार्थ ठरवला असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
प्राचार्या वैशालीताई जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “अडचणींवर मात करत सातत्याने अभ्यास आणि सराव ठेवल्यास यश निश्चित मिळते,” असे सांगितले.
यावेळी विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल श्रेयश संकपाळ, भूमी गायकवाड, श्रावणी अहिवळे, आस्था विश्वकर्मा, ध्रुव कळंबे, राजवीर मोरे, अवनी जाधव आणि यलुबाई जाधव या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, माध्यमिक विद्यालय समितीच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी स्वागत केले, तर सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.











