फलटण – “ब्राह्मण गल्ली परिसरात सुरू असलेल्या पाईपलाईन व रस्त्याच्या कामाबाबत काल काही लोकप्रतिनिधींनी विकासकामात अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला होता. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोणतेही नियोजन न करता कामे सुरू करण्यात आल्याने आज परिसरातील नागरिकांना पाणीटंचाई, वीजपुरवठा खंडित होणे, वाहतुकीची समस्या आणि मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
विकासकामांना आमचा अजिबात विरोध नाही. उलट नागरिकांच्या हिताची सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत, हीच आमची भूमिका आहे. मात्र नागरिकांना वेठीस धरून, कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता आणि लोकांच्या अडचणी समजून न घेता केली जाणारी कामे ही विकासाची योग्य पद्धत नाही. एक-दोन घरांसाठी संपूर्ण परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
काही लोकप्रतिनिधी नागरिकांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी उलट सजग नागरिकांनाच ‘विघ्नसंतोषी’ म्हणत आहेत, हे दुर्दैवी आहे. विघ्नसंतोषी कोण आहे हे जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे. नागरिक पाणी, वीज आणि रस्त्याच्या समस्यांनी त्रस्त असताना त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी राजकीय आरोप करणे योग्य नाही.
प्रशासनाने आणि संबंधित विभागाने तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत करावा. तोपर्यंत टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही कायम नागरिकांसोबत उभे राहणार आहोत.”
असे मत सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी व्यक्त केले आहे.
“विकासकामांना विरोध नाही; पण नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे” – नंदकुमार मोरे
By Team LBNN
On: May 18, 2026 8:14 AM












