सातारा : सातारा नगरपरिषदेच्या शहापूर योजना व कास उद्भव योजनेमधून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे उरमोडी व कास धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा नगरपरिषदेकडून नागरिकांना पाणी वापरात काटकसर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी नळ कनेक्शनला तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जात आहे. तसेच रस्त्यावर पाणी मारणे, पाईपने गाड्या धुणे, कपडे व जनावरे धुणे अशा प्रकारांमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, नळाला डायरेक्ट मोटार लावण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांची मोटार जप्त केली जाईल, असा इशाराही नगरपरिषदेकडून देण्यात आला आहे.
उपलब्ध पाणीसाठा उन्हाळ्यात पुरेसा राहावा यासाठी सर्व नागरिकांनी पाण्याचा वापर जबाबदारीने व काटकसरीने करावा, असे आवाहन सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.
नळाला मोटार लावल्यास जप्ती; पाणी बचतीचे सातारा नगरपरिषदेचे आवाहन
By Team LBNN
On: May 5, 2026 10:54 AM












