आळंदी – मुसळधार पाऊस आणि धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने आळंदीतील इंद्रायणी नदीला महापूर आला असून शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी आणि भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे कडक आवाहन केले आहे.
पूरामुळे इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्याने ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आळंदीचा पिंपरी-चिंचवडसह इतर भागांशी असलेला रस्ता संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक धानोरी आणि चाकण मार्गे वळवण्यात आली आहे.
पूरपरिस्थितीमुळे सिद्धबेट आणि सखल भागातील धर्मशाळांमध्ये अडकलेल्या ४०० हून अधिक वारकरी व भाविकांची प्रशासनाने सुरक्षित सुटका केली आहे. आळंदीत आधीच पोहोचलेल्या भाविकांना वडगाव बाजूच्या उंचावरील सुरक्षित ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारकऱ्यांना सध्या आळंदीत न जाता पुण्यातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मुख्य देऊळवाड्यात होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यासाठी केवळ १,६६० वारकऱ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे.
आळंदी परिसरात अद्यापही पावसाची संततधार सुरू असल्याने नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आळंदीत इंद्रायणीला महापूर; प्रशासनाचे वारकरी-भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन
By Team LBNN
On: July 7, 2026 9:28 AM












