पत्रकारितेच्या क्षेत्रात आल्यापासून आढाव सरांच्या कार्यालयात माझं नेहमी येणं-जाणं असायचं. प्रत्येक भेटीत ते माझ्या कामाचं मनापासून कौतुक करायचे.
” तुझ्या भागातील पहिला पत्रकार तू आहेस, त्या भागात पत्रकारितेची उणीव तू भरून काढलीस. तुझं काम मी नेहमी पाहत असतो. व्हॉट्सअॅपवर तुझ्या बातम्या माझ्या नजरेतून कधीच सुटत नाहीत,” असं ते प्रेमाने म्हणायचे. त्यांच्या या शब्दांमुळे मला नेहमीच नवं बळ आणि प्रेरणा मिळायची.
सरांसोबत काम करण्याची संधी फार मोठी मिळाली नाही, पण जेवढा सहवास लाभला, तेवढ्यातच त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. ते केवळ बातम्यांमधूनच न्याय देत नसत, तर समाजातील अनेक अडचणीत सापडलेल्या लोकांचाही आधार होते. शासकीय कामांसाठी, विविध समस्या घेऊन अनेक नागरिक त्यांच्या कार्यालयात येत असत आणि सर अनेकदा एका फोनवर त्यांचं काम मार्गी लावायचे.
गेल्या वर्षी आढाव सर आपल्याला कायमचे सोडून गेले. आज त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणदिनी, मी, माझा परिवार आणि लोकशाही भारत न्यूज नेटवर्क परिवार त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
– पत्रकार सागर चव्हाण












