काँक्रीट फोडून लोखंड लंपास; प्रशासनाचे दुर्लक्ष की नियोजनाचा अभाव?
फलटण : फलटण शहर व परिसरातून जाणाऱ्या नीरा उजवा कालव्याच्या जिंती नाका ते राव रामोशी पूल या दरम्यान सुरू असलेले अस्तरीकरणाचे काम सध्या रखडल्याचे चित्र समोर येत आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत असून गेल्या काही महिन्यांपासून कोणतीही ठोस प्रगती दिसत नाही.
मागील पंचवार्षिक निवडणुकांदरम्यान या कामाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. बारामतीप्रमाणे कालव्याचे अस्तरीकरण आणि सुशोभीकरण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात काम ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, पंढरपूर पुलावरील सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. जुन्या पुलावरील पादचारी मार्गाच्या संरक्षक कठड्याचे काँक्रीट फोडून त्यातील लोखंडी ग्रील अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय, गणेशोत्सव काळात विसर्जनासाठी नवीन पुलावरील संरक्षक ग्रील कापण्यात आले होते. मात्र उत्सवानंतर ते पुन्हा बसवण्यात आले नाही. उलट तेथे पडून असलेले ग्रीलही गायब झाल्याने चोरीचा संशय व्यक्त केला जात आहे.
या निष्काळजीपणामुळे पुलावरून जाणाऱ्या पादचारी, शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.













