फलटण – दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या लाठीचार्ज व अश्रुधूराच्या नळकांड्यांच्या वापराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने फलटण येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० जुलै रोजी संसद भवन परिसरात विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने मोर्चा काढला होता. मात्र, हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधूराच्या नळकांड्यांचा वापर केला. या कारवाईदरम्यान महिला व अल्पवयीन विद्यार्थ्यांनाही अमानुष वागणूक देण्यात आली.
तसेच, मुंबई येथे काढण्यात आलेल्या आंदोलनादरम्यानही विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) फलटण शहर व तालुका शाखेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विजय येवले, राजू मारुडा, संजय निकाळजे, लक्ष्मण अहिवळे, तेजस काकडे, परवीन शेळके तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फलटणमध्ये आरपीआय (आठवले) गटाकडून दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध
By Team LBNN
On: July 22, 2026 6:13 PM









