
फलटण : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जावली (ता. फलटण) येथील कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान विचारवंत या विषयावर तिने ओघवत्या व प्रभावी शैलीत मनोगत व्यक्त करत परीक्षकांची मने जिंकली.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने सातारा जिल्हा परिषद दरवर्षी वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करते. यावर्षीही या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्णेवाडी (आंदरूड) केंद्र जावली येथील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी राजनंदिनीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही राजनंदिनीने आक्रमक व प्रभावी शैलीत भाषण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तिच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियांका महेश शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपाध्यक्ष राजुभैय्या भोसले, शिक्षण सभापती सौ. तेजस्विनी विक्रम कदम, कृषी सभापती सौ. लता कर्णे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे, शबनम मुजावर तसेच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
राजनंदिनी ही उत्तम वक्ता असून राज्यभर विविध शासकीय व खाजगी स्पर्धांमध्ये तिने यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.












