फलटण -निसर्ग आणि पर्यावरण वाचवण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, फलटण शहरात मात्र ‘निसर्ग संवर्धनाच्या’ नावाखालीच सुरू असलेल्या विचित्र प्रकारांमुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे जपानी ‘मियावाकी’ तंत्रज्ञानाचे नाव पुढे करून जुनी झाडे तोडली जात आहेत, तर दुसरीकडे सामाजिक संस्थांनी कष्टाने जोपासलेली मोठी झाडे वन विभाग मुळासकट उपटून काढत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.
मुद्दा १: मियावाकीसाठी हिरव्यागार ‘गिरीपुष्प’ सह इतर वृक्षांवर कुऱ्हाड
फलटणमध्ये सध्या जपानचे प्रसिद्ध ‘मियावाकी’ तंत्रज्ञान वापरून घनदाट जंगल तयार करण्याचा प्रकल्प राबवला जात आहे. खरे तर हे तंत्रज्ञान ओसाड किंवा पडीक जमिनीवर जंगल तयार करण्यासाठी वापरले जाते. मात्र, फलटणमध्ये या प्रकल्पासाठी त्या ठिकाणी आधीपासूनच डोलणारी ‘गिरीपुष्प’ सारखी झाडे सर्रास तोडली जात आहेत. “असलेली झाडे तोडून नवीन झाडे लावणे, हे कसले पर्यावरण प्रेम?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या वृक्षतोडीमुळे स्थानिक परिसंस्थेचे मोठे नुकसान होत आहे. फॉरेस्ट ऑफिस कार्यालयाच्या परिसरात गिरीपुष्प वृक्ष सोडून साडेचार हेक्टर मध्ये प्रति हेक्टर 625 लिंब वृक्षाची ही लागवड करण्यात आली होती. त्यातील किती वृक्ष तोडले गेले आणि किती शिल्लक राहिले?
मुद्दा २: वनविभाग हद्दीतील २५-३० वड-पिंपळांच्या झाडांचे विनाकारण पुनरोपण
दुसरीकडे, फलटण शहर पोलीस स्टेशन जवळ असलेल्या वनविभाग हद्दीत गेल्या काही वर्षांपासून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वड आणि पिंपळाची सुमारे २५ ते ३० झाडे लावून ती कष्टाने जगवण्यात आली होती. भारतीय संस्कृतीत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही झाडे मोठी झाली असतानाच, वन विभागाने ती तिथून काढून टाकली आहेत. वन विभागाच्या वतीने या झाडांचे ‘रिप्लांटेशन’ (पुनरोपण) करण्यात आले आहे , इतक्या मोठ्या झाडांचे जगण्याचे प्रमाण नगण्य असल्याने या कृतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सामाजिक श्रम आणि सरकारी यंत्रणेचा विरोधाभास
एकीकडे सामाजिक संस्था आणि नागरिक स्वतःचे श्रम व पैसा खर्च करून झाडे लावत आहेत, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा हीच झाडे विकास किंवा नवीन प्रकल्पांच्या नावाखाली नष्ट करत आहेत. मियावाकीच्या नावाखाली केवळ कंत्राटदारांचे खिसे भरले जात आहेत की काय, अशी शंका आता घेतली जात आहे.
प्रशासनासमोर उपस्थित होणारे टोकदार प्रश्न:
१. मियावाकी प्रकल्प राबवताना अस्तित्वात असलेली झाडे का तोडली गेली? मोकळ्या जागेची निवड का झाली नाही?
२. सामाजिक संस्थांनी जोपासलेली वड-पिंपळाची झाडे नेमकी कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या कारणासाठी हलवण्यात आली?
३. पुनरोपण (Replantation) केलेली झाडे आता नक्की कोणत्या स्थितीत आहेत, याचे ऑडिट वन विभाग देणार का?
जुन्या, ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा बळी देऊन कागदोपत्री नवीन जंगल उभारण्याचा हा घाट फलटणच्या पर्यावरणासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.








