फलटण – महाराष्ट्रातील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून लाईनमनमार्फत वीज ग्राहकांच्या घरातील चालू मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात असल्याचा आरोप करत, संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी सौ. रेश्मा पठाण या सहकारी म्हणून उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट मीटरमधील कथित दोषांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही हे मीटर बसवू नयेत, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच केंद्र सरकारने १७ ऑगस्ट २०२१ रोजी संसदेच्या ठरावानुसार स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर स्मार्ट मीटरबाबत विविध ठिकाणी विरोध झाल्यानंतर २३ मे २०२२ रोजी त्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. केंद्र किंवा राज्य सरकारने यासंदर्भात कोणताही नवीन आदेश अथवा अध्यादेश जारी केलेला नसताना वीज ग्राहकांना संदेश पाठवून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम कोणत्या तरतुदीनुसार राबविली जात आहे, असा सवालही ॲड. खरात यांनी उपस्थित केला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित अधिकारी संसदेच्या निर्णयाचा अवमान करत असल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अथवा कठोर ताकीद द्यावी. तसेच महाराष्ट्रातील सर्व स्मार्ट मीटर महावितरणच्या कार्यालयांतून गोळा करून शासनाच्या आदेशाशिवाय त्यांचा वापर होणार नाही, यासाठी ते एका सुरक्षित गोदामात सील करून ठेवावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, न्यायालयाने या प्रकरणाची सुमोटो दखल घेऊन राज्य सरकारला संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. तसेच सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेण्यात यावा आणि पोलीस प्रशासनालाही संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
स्मार्ट मीटर प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
By Team LBNN
On: July 3, 2026 4:58 PM












