फलटण – जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्मालाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
उष्णतेच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी तहान नसली तरीही वारंवार पाणी पिणे, घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करणे, तसेच दुपारी १२ ते ३ या कालावधीत शक्यतो घराबाहेर न जाणे, अशा उपाययोजना कराव्यात. हलकी व सच्छिद्र सुती कपडे परिधान करावीत आणि प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
तसेच शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी ORS, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे यांचे सेवन करावे. उन्हात काम करताना मध्ये मध्ये विश्रांती घ्यावी आणि घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
नागरिकांनी उष्णतेच्या काळात अतिकष्टाची कामे टाळावीत. दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड पेयांचे सेवन टाळावे. तसेच शिळे व जड अन्न खाणे टाळावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये आणि जाड, गडद कपडे वापरणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच कामगारांनी पहाटेच्या वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि जास्त तापमानाच्या वेळी शारीरिक श्रम टाळावेत. गरोदर महिला व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उष्मा लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी घ्यावयाची दक्षता
By Team LBNN
On: March 18, 2026 4:54 PM
---Advertisement---












