सातारा – भारत सरकारच्या निर्देशानुसार आगामी जनगणना २०२७ साठी सातारा जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. देशाच्या इतिहासातील ही १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना ठरणार आहे. यावेळी प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रधान जिल्हा जनगणना अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा (घरयादी व घरगणना) १ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे. या कालावधीत नागरिकांना Self-Enumeration द्वारे https://se.census.gov.in� या संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरता येणार आहे. तसेच १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करतील.
दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष जनगणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे.
जनगणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून सुमारे ५००० प्रगणकांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. यासाठी ९४ फिल्ड ट्रेनर्स नियुक्त करण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षक पुढे तालुका स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत.
जनगणनेत विचारली जाणारी वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय आदी सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून ती केवळ सांख्यिकीय विश्लेषण व विकास नियोजनासाठी वापरली जाईल.
“जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. अशी माहिती फलटण तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांनी दिली.
सातारा जिल्हा प्रशासन जनगणना २०२७ साठी सज्ज; डिजिटल पद्धतीने होणार माहिती संकलन – जिल्हाधिकारी संतोष पाटील
By Team LBNN
On: April 10, 2026 5:13 PM
---Advertisement---











