फलटण : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त शहरात सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती, फलटण यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व विचारप्रबोधन घडवून आणण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा विषय महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या कार्यावर आधारित असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अभ्यास करून लेखनातून मांडणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धा चार गटांमध्ये विभागण्यात आली आहे. इयत्ता चौथी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते पंधरावी आणि खुला गट अशा विविध स्तरांवर विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.
स्पर्धेसाठी लागणारे लेखन कागद आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून, स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीशिवाय स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार, दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता संत सावता माळी महाराज मंदिर, नाना पाटील चौक, फलटण येथे पार पडणार आहे. स्पर्धेचा निकाल 9 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात येणार असून, विजेत्यांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या विचारांची जाणीव निर्माण होऊन समाजप्रबोधनाला चालना मिळावी, हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.













