आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाचा पालखी सोहळा बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान करणार असून गुरुवार, २४ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे.
यानंतर परतीचा पालखी प्रवास बुधवार, २९ जुलै २०२६ पासून सुरू होऊन रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी आळंदी येथे समाप्त होणार आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान पुणे, सासवड, जेजुरी, फलटण, बारड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी आदी ठिकाणी मुक्काम होणार आहेत. वारकरी भक्तांसाठी सकाळचे विसावे, दुपारचे विसावे आणि रात्रीच्या मुक्कामाचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
फलटण येथे शुक्रवार, १७ जुलै २०२६ रोजी पालखी सोहळ्याचा मुक्काम राहणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा फलटणमध्ये मुक्काम होणार आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या नियोजनाची तयारी सुरू करण्यात आली असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












