फलटण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त फलटण शहर पोलीस ठाण्यात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे तसेच पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2026 चे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष हरीश काकडे यांनी 13 व 14 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. फलटणमधील आंबेडकर जयंती ही राज्यातील प्रमुख जयंतींपैकी एक असून सोलापूरनंतर दुसऱ्या क्रमांकावर मानली जाते, असे त्यांनी नमूद केले.
मिरवणुकीदरम्यान महतुरा पेठ व शुक्रवार पेठ येथील अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बी. टी. जगताप यांनी 13 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता स्मारकावर अभिवादन रॅलीसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. सनी काकडे यांनी गावागावातील मिरवणुकांसाठी याच बैठकीत एकत्रित परवानगी देण्याची सूचना मांडली. तसेच जयंतीच्या मिरवणुकी दरम्यान त्या परिसरातील लाईट घालवली जाते. त्यामुळे करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचा आनंद घेता येत नाही. याची दखल घेऊन महावितरण विभागास याबाबत सूचना द्यावी.
एड. मुकेश अहिवळे यांनी जयंतीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त करत ‘ड्राय डे’ लागू करण्याची मागणी केली. नगरसेवक सचिन अहिवळे यांनी मिरवणुकीत फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवरील गाणीच वाजवली जात असल्याचे सांगत सफाई कॉलनी परिसरातील उताराच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
पत्रकार विकास शिंदे यांनी फलटणमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून प्रबोधनपर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जात असल्याचे सांगत आंबेडकर जयंतीचे शिस्तबद्ध व आदर्श आयोजन होत असल्याचे नमूद केले आणि आयोजकांचे कौतुक केले.
पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी सांगितले की, पोलीस बंदोबस्त हा केवळ वाद टाळण्यासाठी नसून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. 13 व 14 एप्रिल रोजी चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ‘ड्राय डे’ संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून आदेश आल्यास पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी गेल्या तीन वर्षांत जयंतीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगत यंदाही उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. अवैध दारू विक्री ज्या ठिकाणी होत आहे त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने कारवाई करावी.‘ड्राय डे’ संदर्भात पुढील वर्षी लवकर प्रस्ताव पाठवण्याची सूचनाही त्यांनी केली.










